गोष्ट अधिकाची

 एका लग्नाला गेले होते. यजमानाच्या थाटाला साजेशी * multi cuisine * मेजवानी होती. खासा बेत होता . सुग्रास अन्नाला पाहून खवळलेल्या भुकेला न्याय द्यायला हवा होता.

पुन्हा पुन्हा जायला लागू नये, बसायची जागा सुटू नये ह्या विचारानुसार बहुतेकांच्या प्लेट्स मध्ये पदार्थांची व पक्वानांची गर्दी झाली होती . सगळ्या चवी मिसळून गेल्या होत्या. यथेच्छ ताव मारला तरी ताट काही रिकामे होईना. आता टाकावे लागणार म्हणून ओशाळ वाटत होत.

 पण आजूबाजूला सगळ्यांची तीच गत झालेली दिसत होती . वाटलं.....

एखादं दिवशी टाकलं पानात तर काय झालं?

माझाच फक्त हा अनुभव नक्की नाही. आपण सगळे *समोर उपलब्ध आहे म्हूणून* अनेक मोहाना बळी पडतो आणि त्या विषयी विसरूनही जातो.

मध्यंतरी "स्टोरी ऑफ स्टफ" नावाची एक शॉर्ट फिल्म पहिली. अमेरिकेतील. ऍनी लिओनार्ड यांनी 10 वर्ष अभ्यास करून बनवलेली.

बातम्या ऐकायच्या म्हणून बाई रेडिओ शॅक घ्यायला मॉलमध्ये गेल्या, रेडिओची किंमत होती फक्त $ 4.99/-

"अगदी हवा तस्सा, देखणा, सुबक, लहानसा, रेडिओ एवढ्या कमी किमतीत कसा? "
ह्या प्रश्नाचा शोध त्या घेऊ लागल्या. ह्या सातत्याने केलेल्या संशोधना नंतर मिळालेल्या उत्तरांनी त्या अस्वस्थ झाल्या.

रेडिओ सारख्या वस्तू बनवायला कुठच्या तरी तिसऱ्या जगातील देशात कच्या मालासाठी खाणकाम चालते.
खनिजांची वाहतुक होते. त्यासाठी इराण-इराक सारख्या देशातुन समुद्रातून काढलेले इंधन वापरले जाते.
मेक्सिको सारख्या देशात कारखान्यात वस्तू तयार करण्यासाठी कित्येक लहान मुले काम करतात.
मालाचे पॅकिंग होते , दुकाने/मॉल पर्यंत वस्तू पोचवल्या जातात. जाहिरात केली जाते. शेवटी त्यांची विक्री होते.

ग्राहकाने विकत घेतलेत्या वस्तूचा वापर तो किती काळ करतो ह्या प्रश्नाचे उत्तर चक्रावून टाकणारे होते व आहे.

भलामोठा प्रवास , कोट्यवधींचा खर्च , निसर्गाची मोडतोड, लहान मोठ्यांचे काबाड कष्ट एवढी यातायात करून तयार झालेल्या 99% वस्तू ह्या सहा महिन्यातच मोडीत निघतात.

खरे वाटत नाही ना?

आपण सवड काढून आवडीने घेतलेल्या 100 वस्तूंपैकी फक्त 1% वस्तू सहा महिन्यानंतर आपल्या वापरात राहतात.
आणलेल्या इतर 99% .वस्तू ... कचऱ्यात, खड्ड्यात किंवा भट्टीत जातात. म्हणजे जमीन, पाणी व हवेचे प्रदूषण आलेच.

प्रदूषण ही समस्या निसर्गाची असली तरी तिचे मूळ हे माणसाच्या * अजून हवे * च्या हव्यासातच आहे , नाही का?

'आजच साड्यांचा पावसाळी सेल लागलाय'
'अमेझॉन वर दिवाळी फेस्टिव्हल ऑफर '
स्नॅपडील, मंत्रा, डी मार्ट, बिगबझार .....
सगळे म्हणतात " घ्या ...हे नको तर ते घ्या ...बाजारात जायचे कष्ट करू नका. आम्ही तुम्हाला हवा तो माल तुमच्या घरपोच देतो ... पण सतत काहीतरी घ्याच मात्र."

कितीतरी वस्तू आपण

'असू दे घरात, पडेल उपयोगी कधी तरी' अशी मनाची समजूत घालून आणतो....ठेवतो....
जमल्यास वापरतो नाहीतर....
नवीन मॉडेल आलेलेच असते पाठोपाठ ते सहजच हिप्नॉटीझमच्या प्रभावाखाली असल्या प्रमाणे विकत घेतो. मर्यादा फक्त पैशांची असते.

आपल्याला कितीही जास्त, अधिक उपलब्ध असले तरी..

कपाटात कोऱ्या साड्यांचा ढीग असला तरीही वापरून मऊ झालेल्या साडीकडे मन जाते.

नवे बूट चावतात...

वीक एन्ड होम कर्जत, कसाऱ्याला आहे , तिथे जायला ईच्छा आसते पण ...वेळ?

नव्याची गरज नाही हे कळतं पण वळत नाही असे काहीसे झालेय आपले.

म. गांधी म्हणतात,

"निसर्ग माणसाच्या गरजेसाठी पुरेस आहे हावेसाठी मात्र नाही"

निसर्ग सांभाळायचा असेल तरआधिकाचा हव्यास कमी करायचा थोडा तरी प्रयत्न करायला हवा ना ?

सौ अनुराधा चं भडसावळे.

Comments

Popular posts from this blog

मदनबाण

जलाशयांना विळखा जलपर्णीचा! इलाज सगुणा जलसंवर्धन तंत्राचा ( SJT )!!

वैशिष्ठयपूर्ण नाते : कमळ पुष्प व समृद्धी यांचे. भाग 1